About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती, गडहिंग्लज

Tourism

About Gadhinglaj

आमचं गडहिंग्लज :
कोल्हापूर जिल्हाच्या दक्षिण भागातील तालुका म्हणजे गडहिंग्लज. महाराष्ट्र कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेल्या आमच्या गडहिंग्लजात गूळ, भुईमूग व मिरचीची मोठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे. जवळचं हरळी येथे साखर कारखाना व तेलगिरणी आहे.
गडहिंग्लजचे नाते व्यापाराच्या माध्यमातुन कोकणाशीही घट्ट जुळले आहे गडहिंग्लजमधून कोकणात प्रवेश करताना येथील पर्यटन न्याहाळण्याची संधी पर्यटकांना आहे.

ऐतिहासिक वारसा :
छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामनागड येथे आहे.

सांस्कृतिक वारसा :
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेले पू . साने गुरूजी मोफत वाचनालय गडहिंग्लजमध्ये आहे.
तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व जेष्ठ साहित्यिक डॉ . राजन गवस यांचे मुळ गाव करंबळी हे आहे.
गडहिंग्लजमधली नाट्यसंस्कृती सर्वदूर पोचली आहे. भडगाव , गडहिंग्लज , करंबळी, कडगाव परिसरात प्रसिद्ध मराठी चित्रपट जोगवा, सत्वपरिक्षा, देवघर यांचे चित्रीकरण  झाले आहे.

सामानगड :
हा किल्ला मुळ ‘ भीमसासगिरी ‘ या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. समुद्रसपाटीपासुन उंची  2972 फूट असून किल्ल्याचे क्षेत्रफळ  12.34 हेक्टर आहे. बाराव्या शतकात राजा भोजने हा किल्ला बांधला गेला तर शिवरायांच्या काळात किल्याची डागडुजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींची या गडावर भेट झाल्याचा इतिहास आहे.

प्रतापराव गुर्जर स्मारक :
नेसरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले होते.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे असे हे स्मारक आहे.

 

 

काळभैरव मंदिर :
प्राचीन कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहीले जाते डोंगर कपारीत मंदिर असुन शेजारीच शेंद्री चा जलाशय लक्ष वेधून घेतो. दरवर्षी फेब्रुवारीत या देवाची यात्रा भरते.

पेशवेकालीन गणेश मंदिर :
आजरा रोडवरील इंचनाळ येथे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे.

भडगावची गुड्डाईदेवी :
भडगावची ग्रामदेवी श्री गुड्डाईदेवीचे मंदिर उंच टेकडावर आहे.

 

पाहण्यासारखं :

  • किल्ल़े सामानगड
  • सामानगडच्या पायथ्याशी चाळोबा मंदिर
  • नेसरी- कानडेवाडी दरम्यान सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचे स्मारक
  • माद्याळचे सोमलिंग मंदिर
  • ऐनापुरमधील जैन शिलालेख
  • करंबळीतील नारायणदेव मंदिर
  • शेंद्री , करंबळी , नरेवाडी , वैरागवाडी , तेरणी , येणेचवाडीचे जलाशय

Kille Samangad

किल्ले सामानगड :
किल्ले सामानगड हा शिवकालीन किल्ला आहे. 12 व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला. भोज राजवटीच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला. 12.34 हेक्टर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर हा किल्ला आहे. 1667 मध्ये छ. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1676 मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान, परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती.
1844 मध्ये करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडात या गडाचा गडकरी मुंजाजी कदम शहीद झाला. जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला व किल्ल्याची नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते.
कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर आग्नेय कोपऱ्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून 2972 फूट उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्यास भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी प्रवेश बुरूज, झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत.

2006 मध्ये स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने सामानगडाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळामध्ये समावेश झाला आणि किल्ल्याच्या विकासासाठी एक कोटी 33 लाखांचा निधी मिळाला. त्यातून किल्ल्यावर यात्री निवास, उपहारगृह, विहिरींना संरक्षक कठडे, बगीचा, अंतर्गत रस्ते, डॉरमेटरी, धर्मशाळा, बालोद्यान व सांस्कृतिक सभागृह, इत्यादी कामे झाली. स्व. डॉ. ए. डी. शिंदे यांनी किल्ल्यावरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दरवर्षी महाशिवरात्रीला गडावरील हनुमान देवाची यात्रा भरते. पंचक्रोशीतील सात पालख्यांची यात्रेत भेट होते. इतिहास संशोधक व अभ्यासकांसह पर्यटक व भाविक गडाला भेट देतात. याशिवाय शाळा-महाविद्यालयांच्या सहली येतात. मात्र, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धीपासून हा किल्ला अजून दूरच आहे.

ऐतिहासिक महत्त्व :
छ. शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या या किल्ल्यावरील वास्तव्याची इतिहासात नोंद.
संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी 21 बाय 14 आकारातील तिरंगा ध्वज या किल्ल्यावरील झेंडा बुरुजावर शासनातर्फे फडकविला जातो. मंत्रालयानंतर इतक्या मोठ्या आकारातील तिरंगा केवळ याच गडावर फडकविला जातो.

काय पहाल..?
रामदासकालीन हनुमान मंदिर, भवानीमाता मंदिर, भुयारी शिवमंदिर, सूर्य मंदिर, चाळोबा मंदिर, भीमशाप्पा मठ, अंधार कोठडी, प्राचीन गुहा, चोरखिंड व सात कमान विहीर, रामखडी (सूर्यास्त दर्शन पॉर्इंट), गायमुख तीर्थ, शाळीग्राम.

 

Senapati Prataprao Gujar Smarak

सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक :
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘कानडेवाडी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे.  गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले.

‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर होते. आपली चूक कळून आल्यानंतर प्रतापराव केवळ सहा सरदारांसह, बहलोलखानाच्या सैन्यावर त्वेषाने चालून गेले. हे लढाई नेसरी-कानडेवाडी गावातील खिंडीत झाली. बेभान होवून सहा स्वारानिशी प्रतापरावांनी खानाच्या हजारोंच्या सैन्यावर चाल केली व हौतात्म्य पत्करले. धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक आहे.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे.

वेडात मराठी वीर दौडले सात…
आठवा तो इतिहास, जागवा तो पराक्रम, स्वराज्यासाठी वीरांनी केलेल्या अंगावर शहारे आणणारे पराक्रम करून आपणास स्वातंत्र मिळवून दिले. त्यांचा या पराक्रमामुळेच आज आपण गुण्यागोविंदाने जगत आहोत. अशा या विरांना अभिवादन करायला हवेच. तो इतिहास जाग ठेवण्यासाठी अनेक इतिहासप्रेमी पर्यटक अशा स्थळांना भेटी देतात. तो इतिहास जाणून घेतात. कानडेवाडी येथे प्रतापराव गुर्जर यांची स्मारक आहे या स्मारकांला अनेकजण भेट देतात.